Monday, February 22, 2016

अभ्यास कसा करावा

10 वी चा
अभ्यास कसा करावा ?
बारावीची परीक्षा तर सुरु झाली. आता वेध लागलेत , दहावीचे. त्यांची परीक्षा येत्या 1 मार्चपासून सुरु होतेय. विद्यार्थी मित्रहो , वर्षभर तुम्ही भरपूर अभ्यास केला असेलच. आता या उरलेल्या दिवसात टेन्शन न घेता लक्ष देऊन अभ्यास करा.
  दहावीचे वर्षभर आणि विशेषतः आता परीक्षा जशी जवळ येईल , तशी घरातील वडिलधारी माणसे तुमच्यावर लक्ष ठेवून असतात. त्यांच्या असंख्य सूचनाही सुरू असतात. त्याचा राग येऊ लागतो आणि अशा त्रासिक मूडमध्ये अभ्यासात लक्ष लागत नाही ; पण वडिलधाऱ्यांच्या या वागण्याचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करा. आपली आई तिची सर्व कामे करूनही न दमता आपल्यासाठी कायम दिवस-रात्र उपलब्ध असते. आईने तिचा दिनक्रम आपल्या अभ्यासाच्या वेळेला पूरक बनवला आहे. तुम्हाला चांगले मार्क मिळावे , यासाठीच तिची तळमळ आहे , असा विचार करा आणि प्रसन्न मनःस्थितीत शांतपणे अभ्यासाला बसा. तुमचा अभ्यास चांगला होईल
सलग तीन-चार तास किंवा दिवसभर एकाच विषयाचा अभ्यास करू नका. दर तास-दीड तासाने
 आपल्याला सोयीच्या वेळी अभ्यास करा. पहाटे लवकर किंवा रात्री जागून , यापैकी जे सोयीचे असेल , त्यानुसार वेळ ठरवा. पालकांनीही अभ्यासाच्या वेळेचा आग्रह धरू नये.
या काळात आहार संतुलित ठेवा. संतुलित म्हणजे सॅलड , कडधान्ये , सूप असेच काही नाही. रोजचेच जेवण ; पण जिभेसाठी जेवू नका. थोडक्यात , जेवल्यावर झोप येईल , असे चमचमीत पदार्थ , पक्वान्ने शक्यतो टाळा. वेळच्या वेळी ; पण मोजके आणि नेहमीचे जेवण करा. हॉटेलांतील अन्न शक्यतो टाळाच. विषय बदला.
विषय बदलण्यापूर्वी दहा मिनिटांचा ब्रेक घ्या. त्यामध्ये आपल्या आवडीचे उदाहरणार्थ , गाणी ऐकणे , टीव्ही पाहणे , आई-वडिलांशी किंवा मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारणे , कम्प्युटर गेम खेळणे असे काहीही करू शकाल. मात्र , हा ब्रेक दहाच मिनिटांचा असेल , याची काळजी घ्या.
पुन्हा अभ्यासाला बसताना सुरुवातीच्या पाच-सात मिनिटांत आधी तास-दीड तासात काय अभ्यास केला , याची उजळणी करून पाहा. त्यातील किती लक्षात राहिले आहे , याचा अंदाज घ्या आणि मगच नवीन विषयाची सुरुवात करा.

परीक्षेमध्ये जरी पाचपैकी कोणतेही चार सोडवा , असे ऑप्शन असले , तरी अभ्यास करताना कोणताही भाग ऑप्शनला टाकू नका. अभ्यास करताना जे जे अवघड वाटेल , ते ते शिक्षकांना विचारून शंका समाधान करून घ्या. अभ्यास करतानाच जर तुम्ही काही भाग ऑप्शनला टाकलात , तर हॉट्सचे प्रश्न सोडवता येणार नाहीत. परीक्षेच्या वेळी , पाचपैकी कोणते चार अधिक चांगले येतात , ते पाहा आणि सोडवा.
अभ्यासाला बसताना जेव्हा आपण ताजेतवाने असतो , तेव्हा आपला मेंदूसुद्धा अधिक तल्लख असतो. अशा वेळी म्हणजे थोडक्यात जेव्हा आपला अभ्यासाचा मूड असतो , तेव्हा सामान्यपणे आपल्याला आवडणाऱ्या विषयाचा अभ्यास करण्यास आपण सुरुवात करतो. तसे न करता जेव्हा अभ्यासाचा मूड असेल , तेव्हा कठीण वाटणाऱ्या विषयाने किंवा न येणाऱ्या टॉपिकने अभ्यासाची सुरुवात करा ; कारण , बराच वेळ अभ्यास केल्यावर , कंटाळा आल्यावर आपण कठीण विषय अभ्यासाला घेतला , तर आपला मेंदू अधिक ताण घेण्याच्या परिस्थितीत नसतो. परिणामी , लगेचच झोप येऊ शकते.
रोजच्या दिनक्रमाचं व अभ्यासाचं वेळापत्रक बनवा. जे आपल्याला आचरणात आणता येईल , असंच वेळापत्रक तयार करा. उदाहरणार्थ , सकाळी किती वाजता उठणार , हे ठरवताना पहाटे उठावं , या सूत्रानुसार ' पहाटे पाच वाजता उठावे ' असे ठरवूच नका. कारण भल्या सकाळी उठणं तुम्हाला जमणार नाही हे तुम्हाला माहितेय. ' सकाळी सात वाजता उठणार ,' हेसुद्धा वेळापत्रक असू शकते. फक्त नंतरचा वेळ नीट हुशारीने वापरा. दिवसभरात किमान आठ ते दहा तास अभ्यास होईल आणि आपल्याला सोयीचे वाटेल , असे वेळापत्रक बनवा. महत्त्वाचे म्हणजे , जे ठरवाल , ते कठोरपणे आचरणात आणा.


परीक्षा म्हटल्यावर अनेक प्रश्न पडतातच. त्यातलेच काही नेहमीचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं खास मुंटाच्या विद्यार्थी मित्रांसाठी...
उत्तरपत्रिकेवर आपले नाव आणि बोर्डाकडून आलेला बैठक क्रमांक कुठे लिहायचा असतो ? पुरवणीवरही पण तो लिहायचा असतो का ?
उत्तरपत्रिकेवर कुठेही आपलं नाव लिहायचं नसतं. पहिल्या पानावर एकाच ठिकाणी सही करायची असते. बोर्डाकडून आलेला बैठक क्रमांक उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावर असलेल्या ठराविक रकान्यातच , अंकांत आणि अक्षरांत लिहावयाचा असतो ; तसेच पुरवणीवरही ठराविक रकान्यातच बैठक क्रमांक लिहायचा असतो. इतर कोणत्याही ठिकाणी आपले नाव आणि बोर्डाकडून आलेला बैठक क्रमांक चुकूनसुद्धा लिहू नका.

प्रश्नपत्रिकेवर बैठक क्रमांक लिहायचा का ?
प्रश्नपत्रिकेच्या वरील पानावर व प्रश्नपत्रिकेच्या आतील प्रत्येक पानाच्या उजव्या बाजूससुद्धा बैठक क्रमांक लिहायचा असतो.

पर्यवेक्षकाची सही कुठे असते ?
आपल्या उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावर आणि प्रत्येक पुरवणीवर पर्यवेक्षकाची सही आहे , याची खात्री करा.

उत्तरपत्रिकेत दोन्ही बाजूस समास सोडावा का ?
उत्तरपत्रिकेत डाव्या बाजूस समास आखलेलाच असतो. त्यात केवळ प्रश्नक्रमांक व त्या खाली उपप्रश्न क्रमांक लिहावा. उत्तरपत्रिकेत आखलेल्या रेषा उजवीकडील बाजूस अगदी शेवटपर्यंत नसतात. साधारण उजवीकडील एक सेंटीमीटर जागा कोरी ठेवलेली असते. त्यात काही लिहू नका. वेगळा समास आखून जागा सोडण्याची आवश्यकता नाही.

पुरवण्या किती घेता येतात ? पुरवण्यांवर क्रमांक लिहावे का ?
- आपल्याला उत्तरे लिहिण्यासाठी आवश्यक तितक्या पुरवण्या घेता येतात , त्यास कोणतेही बंधन नाही. पुरवण्यांवर क्रमांक लिहिला , तरी चालेल. उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावर पुरवण्यांची संख्या लिहायची असते. पेपरच्या शेवटी करायचे हे काम असल्याने घाईमध्ये विसरू शकते. तसे न करता आठवणीने किती पुरवण्या जोडल्या , याचा आकडा न विसरता लिहा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पुरवण्या क्रमाने बांधा.

उत्तरपत्रिकेला जोडलेला ग्राफचा कागद हा पुरवणीमध्ये मोजावा का ?
उत्तरपत्रिकेला जोडलेला ग्राफचा कागद हा पुरवणीमध्ये मोजला पाहिजे. केवळ ग्राफचा कागद जोडलेला असेल आणि एकही पुरवणी जोडली नसेल , तरी ग्राफच्या कागदासाठी एक पुरवणी अशी नोंद करा.

पेपर लिहिण्यासाठी कोणत्या रंगाच्या शाईचं पेन वापरावं ?
पेपर लिहिण्यासाठी निळ्या किंवा काळ्या रंगाच्या शाईचे पेन , बॉल पेन किंवा जेल पेन वापरावे. यापैकी ज्या रंगाचं पेन वापरण्याचं ठरवाल , त्या एकाच रंगाचं पेन वापरावं. दोन वेगवेगळ्या रंगांची पेन्स वापरू नयेत. निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनशिवाय इतर कोणत्याही रंगाच्या शाईचा वापर केल्यास पेपर तपासला जात नाही व गुणही दिले जात नाहीत.

रफ वर्क म्हणजे कच्चं लिखाण करण्यासाठी वेगळे कागद मिळतात का ? नसल्यास कच्चे लिखाण कुठे करावं ?
रफ वर्क करण्यासाठी सुटे वेगळे कागद मिळत नाहीत ; पण रफ वर्क प्रश्नपत्रिकेवर करू नका. रफ वर्क उत्तरपत्रिकेतच करायचं असतं. ते उत्तरपत्रिकेच्या डाव्या हाताच्या पानांवर करावे. रफ वर्क पेनने करू नये ; ते पेन्सिलनेच करायचे असते. ज्या पानावर रफ वर्क कराल , त्या पानाच्या वर तसे नमूद करा.

उत्तरं लिहिताना एका खाली एक अशी लिहावीत का ?
उत्तरपत्रिका पाठपोट २० पानांची असते. उत्तरपत्रिका मिळाल्यावर ती सुस्थितीत असल्याची व त्यात सर्व पाने असल्याची खात्री करून घ्या. उत्तरे लिहिताना प्रत्येक नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर सुरू करावे. प्रश्नातील उपप्रश्नाचे उत्तर मात्र एका खाली एक त्याच पानावर लिहावे. उत्तर लिहिताना समासामध्ये प्रत्येक उपप्रश्नाचा क्रमांक नीट लिहावा. समासात प्रश्न किंवा उपप्रश्नाचा क्रमांक लिहिण्यासाठी वेगळ्या रंगाच्या शाईचे पेन वापरू नये.

अभ्यासासाठी योग्य वेळ कोणती ? पहाटे , दुपारी की रात्र ?
अभ्यास कोणत्या वेळी करावा , ते प्रत्येकानं ठरवावं आणि आपल्याला सोयीच्या वेळी अभ्यास करावा. दुपारी अभ्यास होत नाही , तर संध्याकाळी करा , रात्री करा , पहाटे उठून करू शकता. पण दिवसभरात मिळून ८ ते १० तास अभ्यास होईल , हे पाहा.

मी जिंकणारच

परीक्षा अगदी जवळ आलीय , कितीही केला तरी अजून खूप अभ्यास बाकी आहे , या विचाराने मानसिक ताण येणं स्वाभाविक आहे ; पण राहिलेल्या अभ्यासाचा मानसिक ताण घेऊन जर अभ्यास करत असाल , तर वेळही वाया जाईल आणि अभ्यासही होणार नाही. परीक्षा जवळ आल्याचा स्वाभाविक ताण असू द्या ; पण अनाठायी मानसिक ताण घेऊ नका. या उलट किती अभ्यास राहिलाय , किती झालाय याचा अंदाज घेऊन राहिलेल्या अभ्यासाचं व दिवसांचं नियोजन करा आणि माझा अभ्यास ठराविक वेळेत मी पूर्ण करणारच , या मानसिकतेत अभ्यास करायला बसा. ' मला जमणार आहे. मी चांगले मार्क मिळवणार आहे ,' असे सकारात्मक विचार मनात ठेवा म्हणजे मानसिक ताणाशिवाय चांगला अभ्यास होईल.

बऱ्याच वेळा अभ्यास करायला सुरुवात केली , की झोप येऊ लागते. याचे कारण तो विषय कंटाळवाणा नसून , आपला मेंदू थकलेला असतो , हे ध्यानात घ्या. आपल्या मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळाला नाही , तर मेंदू लवकर थकतो. त्यामुळे अभ्यास करताना झोप आली , तर थोडी हालचाल करा , उड्या मारा , थोडे चाला. एका जागेवर बसल्याने मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो. व्यायाम करण्याने , चालण्याने , धावण्याने ; थोडक्यात हालचाल केल्याने मेंदू पुन्हा तरतरीत होतो.

परीक्षा जवळ येईल , तशी झोप कमी करून जागरणं करून अभ्यास करू नका. पुरेशी झोप घेणंसुद्धा अत्यंत आवश्यक असतं. आपण जेव्हा झोपतो , तेव्हा मेंदूला विश्रांती तर मिळतेच ; पण झोपेच्या काळात मेंदू दिवसभरात जमा केलेल्या ज्ञानाचे , माहितीचे विश्लेषण करून त्याचे वर्गीकरण करत असतो. केलेला अभ्यास स्मरणात राहण्यासाठी हे आवश्यक असते.
द्वारा पोस्ट केलेले Sunil Rathod 

No comments: